मोर्शी (अमरावती) : मोर्शी येथील खुले कारागृह येथे भारतीय महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. खुले कारागृह स्थापन झाल्यापासून म्हणजे २००८ पासून सतत १० व्या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कारागृहात बंदी असणाऱ्या १५१ पुरुष कैद्यांना राखी बांधून रक्षण करण्याचे वचन घेतले. या उपक्रमात स्थानिक महाविद्यालयाच्या विद्यर्थ्यांनीही सहभाग घेतला.
गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षा भोगत असणारे बंदी या कारागृहात आहे. कुणी खुनाच्या गुन्ह्यात तर कुणी चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. घरापासून व समाजापासून तुटलेल्या या बंदींना मानवतेचा दृष्टिकोन ठेऊन कारागृह राष्ट्रीय सेवा योजना पथक भारतीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी बहिण आणि भाऊ मिळवून दिले आहेत. कित्येक वर्षांपासून घर न पाहणारे तुरुंगातील बंदी या अभिनव उपक्रमाने चांगलेच भारावले आहेत. रक्षाबंधन हा अभिनव उपक्रम खुल्या कारागृहात घेण्यात आला. बंदी पुरुषांना राखी बांधली. या वेळी मिठाईचेही वाटप करण्यात आले. कारागृहात राष्ट्रीय सेवा योजने तर्फे कैद्यांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम घेऊन मानव अधिकार काय असू शकतात याचेच उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
गुन्हेगारीचा शिक्का बसल्याने त्यांच्याशी हातमिळवणी करण्यास टाळाटाळ होते, पण न्यायालयीन बंदींच्या हातावर राखी बांधत आगळ्या वेगळ्या प्रकारे राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. तब्बल १५१ बंदिंनी आज हातावर राखी बांधलेली मनगटे उंचावत, ‘आता ही मनगटे उठतील तर चांगल्या कामासाठीच’ अशी शपथ घेतली आणि वातावरण भावनिक झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुले कारागृह अधीक्षक ए व्ही मलवाड उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एस. बी. बीजवे, प्रा. व्ही. व्ही. खांडेकर, गणेश राऊत, सुरेंद्र ठाकरे, प्रवीण मोडकर, प्रा. डॉ. एल. आर. टेंभूर्णे, राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ संदीप राऊत, प्रा दीपक काळे, डॉ भैया चिखले, प्रा एम आर वाहने, बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष रुपेश वाळके, एस. बी. राठोड यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात करून १५१ बंदी जणांना व तुरुंग कर्मचारी यांना राखी बांधून कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ संदीप राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ एल. आर. टेंभूर्णे यांनी केले.